हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा   

मडविकेट, कौस्तुभ चाटे 

दरवर्षी जून महिन्यापासून सुरु होणार्‍या इंग्लिश क्रिकेट सिझन कडे सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. इंग्लिश क्रिकेट सिझन खास असतो यामध्ये काहीच शंका नाही. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया बरोबरच इंग्लंड-भारत क्रिकेट मालिकांना अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. कसोटी मालिका असो अथवा एकदिवसाचे सामने  किंवा टी-२० सामने, भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील क्रिकेट सामने मोठ्या चुरशीने खेळले जातात. या दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध अनेक वर्षांपासून आहेत. अगदी भारताला कसोटी दर्जा मिळण्याच्या आधीपासून या दोन संघांमध्ये (संघांची नावे बदलली तरीही) सामने होत आहेत. २०२५ हे वर्ष एका अर्थाने खास असणार आहे. भारताचे ३ संघ या वर्षीच्या इंग्लिश उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये खेळणार आहेत.  नुकताच भारत ’अ’ संघाने इंग्लंड ’अ’ संघाचा दौरा केला. तर येत्या काही दिवसांमध्ये भारतीय महिला संघ देखील इंग्लंडच्या दौर्‍यावर जाईल. त्याबरोबरच या मोसमातील प्रमुख आकर्षण म्हणजे भारताचा कसोटी संघ इंग्लिश संघाविरुद्ध ५ कसोटीची मालिका खेळणार आहे. 
 
भारत ’अ’ संघ इंग्लंड ’अ’ संघाविरुद्ध (ज्याला इंग्लंड लायन्स संघ असे संबोधले जाते) २ सामने खेळला. प्रामुख्याने या दोन सामन्यांचे प्रयोजन दोन्ही संघातील प्रमुख खेळाडू कसोटी क्रिकेटसाठी किती तयार आहेत हे बघणे ही होती. भारतीय संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन याने केले. या दोन सामन्यांत खेळणार्‍या अनेक खेळाडूंकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष होते. करुण नायर, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर सारखे खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करतात हे बघणे महत्वाचे होते. बहुचर्चित करुण नायरने पहिल्या सामन्यात द्विशतक करून आपण कसोटी पुनरागमनासठी तयार असल्याचे दाखवून दिले. तर दुसर्‍या सामन्यात खेळलेल्या के एल राहुलने देखील शतक केले. ध्रुव जुरेल, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी सारख्या फलंदाजांनी देखील आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला. हे सर्वच खेळाडू भारताच्या मुख्य संघाचा भाग असणार आहेत. त्यामुळे यांची कामगिरी चांगली होणे भारतीय कसोटी संघासाठी महत्वाचे आहे. 
 
रोहित आणि विराटच्या निवृत्ती नंतर नवीन दमाच्या भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ कशी कामगिरी करतो हे बघावे लागेल. या दौर्‍यापासून भारतीय कसोटी संघाचे नवीन पर्व सुरु झाले आहे असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. भारताच्या या कसोटी संघामध्ये दर्जेदार खेळाडू आहेत, ज्यांनी वेळोवेळी खेळाच्या तीनही प्रकारांमध्ये चांगला खेळ केला आहे. वर उल्लेख केलेल्या खेळाडूंबरोबरच कर्णधार गिल, उप-कर्णधार ऋषभ पंत, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर सारख्या खेळाडूंवर देखील नजर असेल. या संघातील बहुतेक खेळाडू आयपीएल नंतर इंग्लंड दौर्‍यावर जात आहेत. त्यामुळे खेळाच्या या फॉरमॅटमध्ये ते स्वतःला कशाप्रकारे सिद्ध करतात हे बघावे लागेल. 
 
गेल्या काही वर्षांत इंग्लंड मध्ये झालेल्या कसोटी सामन्यांत यजमान संघाने (इंग्लंडने) भारतीय संघावर वर्चस्व गाजवले आहे. मागील मालिका (२०२१-२२) २-२ अशी अनिर्णित ठरली होती, परंतु त्याआधील ३ मालिकांमध्ये आपण पराभव पत्करला आहे. २००७ मध्ये आपण मिळवलेल्या मालिका विजयानंतर आपल्याला इंग्लंडचे मालिका विजयाची प्रतीक्षाच आहे. त्यानंतर झालेल्या ४ मालिकांमध्ये आपण २०११ चा अपवाद वगळता प्रत्येक मालिकेत एखादा दुसरा सामना जिंकला आहे  परंतु मालिका विजय आपल्यासाठी अजूनही दूरच आहे. गिलच्या नेतृत्वाखालील हा संघ मालिका विजयासाठी कसोशीने प्रयत्न करेल अशी आशा आहे. 
 
भारतीय संघ या मालिकेत ५ कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात २० जूनपासून लीड्स येथील सामन्याने होईल. २०२५-२७ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीची सुरुवात या मालिकेपासून होणार आहे. मागील स्पर्धेत (२०२३-२५) भारतीय संघ अंतिम सामन्यात खेळण्यास अपात्र ठरला होता. येत्या, नवीन स्पर्धेत आपल्याला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. या स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या संघांचे आपल्याला आव्हान असेल. कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गंभीर या जोडीला नवीन दमाच्या संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्याचे आव्हान असेल. स्वतः कर्णधार शुभमन गिलची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी फारशी चांगली झाली नाहीये, त्यामुळे आपली कामगिरी उंचावत संघाकडून चांगला खेळ करून घेणे महत्वाचे आहे. इंग्लिश संघाचा विचार करता जोे रूटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला साधारण ३००० धावांची आवश्यकता आहे. या मोठ्या दौर्‍यामध्ये तो किती धावा करतो हे बघावे लागेल. तो अजूनही काही वर्षे क्रिकेट खेळू शकेल. त्यामध्ये तो सचिनचा विक्रम मोडू शकेल का याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे.
 
या मालिकेपासून इंग्लंड-भारत या दोन संघांमध्ये होणार्‍या या मालिकेला तेंडुलकर-अँडरसन मालिका असे संबोधले जाईल. २००७ मध्ये या पालिकेला पतौडी मालिका असे नाव दिले गेले होते, पण आता हा नाव बदलले गेले आहे. यामागील कारणे काहीही असो, पण या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन या दोन महान खेळाडूंचा सन्मान होणार आहे हे नक्की. 
 
एकीकडे ही मालिका सुरु असेल तेव्हाच, २८ जून पासून भारतीय महिलांचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर असेल. साधारण ३ आठवडे चालणार्‍या या दौर्‍यात भारतीय महिलांचा संघ ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हा संघ इंग्लिश दौर्‍यात चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्झ, हरलीन देओल, रिचा घोष, दीप्ती शर्मा अमनजोत कौर, शफाली वर्मा, स्नेह राणा सारख्या खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष असेल. महाराष्ट्राकडून खेळणारी तेजल हसबनीस आणि मुंबईची सायली सातघरे कशा खेळतात हे बघणे देखील औत्सुक्याचे असेल. या वर्षात होणार्‍या महिलांच्या एकदिवसांच्या सामन्याच्या   विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या दौर्‍याकडे बघता येईल. ही विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे, त्यामुळे आपल्या खेळाडूंसाठी हा दौरा नक्कीच महत्त्वाचा आहे. इंग्लिश महिलांचा संघ बलवान आहे, त्यामुळे भारतीय महिला संघाला आपला खेळ उंचवावा लागेल. या बरोबरच या वर्षीच्या इंग्लिश मोसमात अजून एक महत्वाचा सामना होणार आहे, सलग तिसर्‍यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याकडे देखील क्रिकेट रसिक लक्ष ठेवून असतील. एकूणच २०२५ चा इंग्लिश उन्हाळा क्रिकेटमय आहे हे नक्की.       

Related Articles